धाव धाव धावतो आहे,
दिशा मात्र कळत नाही.
ह्रदयाचे पाऊल कधी,
ह्रदयाकडे वळत नाही.
इतकं जगून झालं पण,
जगायला वेळ नाही.
जगतो आहोत कशासाठी,
कशालाच कशाचा मेळ नाही.
क्षण एक येईल असा,
घेऊन जाईल हा श्वास.
अर्ध्यावरच थांबलेला,
असेल जीवन प्रवास.
अजूनही वेळ आहे,
थोडं तरी जगून घ्या.
सुंदर अशा जगण्याला,
डोळे भरून बघून घ्या.
जगणं…
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे…
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन त्यांच्यबद्दल थोडसं…
शिवसेना... झिंदाबाद !
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा... विजय असो !!
आवाज कुणाचा...शिवसेनेचा !!!
अशा गर्जनांनी अवघा महाराष्ट्र दणाणत होता. साठच्या दशकात बाळ केशव ठाकरे नावाचं चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आदळले. त्याच्या तडाख्याने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. एवढ्याने न थांबून पुढे हे वादळ दिल्लीवर जाऊन धडकले, भारताच्या विरोधी राष्ट्रांवरही त्याची कंपने जाणवू लागली.
समाज प्रबोधनाचा वारसा आपल्या वडिलांकडून लाभलेल्या बाळ ठाकरे यांनी १९६० साली मार्मिक ह्या साप्ताहिकामधून समाजातील व्यंगावर आपल्या कुंचल्याद्वारे ठाकरी आसूड ओढण्यास सुरुवात केली. एवढ्यानेच ते थांबले नाहीत, तर महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी १९६६ मध्ये शिवसेना ही संघटना स्थापन केली. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज्यांवर दृढ श्रद्धा असणाऱ्या ठाकरेंनी निवडलं मराठी साम्राज्याचं निशाण, "जरी पटका" आणि संघटनेचे प्रतिक ढाण्या वाघ. अतिशय तेजस्वी चर्या आणि प्रभावी वक्तृत्वाने त्यांनी लोकांच्या मनावर गरुड केलं. आणि मग बाळ ठाकरेंचे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कधी झाले हे समजलंदेखील नाही. दक्षिण आणि मध्य मुंबईतल्या समस्त तरुणवर्गाचे मन बाळासाहेबांनी कधीच जिंकले होते. सुरुवातीला कम्युनिस्टांची दादागिरी मोडून काढून त्यांनी ह्या विभागात भगवा फडकवला. दक्षिणात्य लोकांचे अधिपत्य असलेल्या नोकऱ्यांमध्ये मराठ्यांना प्राधान्य मिळून देण्यासाठी त्यावेळी त्यांनी "लुंगी हटाव, पुंगी बजाव" आंदोलन छेडले. शिवसेनेचा ढाण्या वाघ महाराष्ट्रभर डरकाळ्या फोडीत हिंडू लागला.
बाळासाहेब हे अतिशय परखड होते. त्यांना जे योग्य वाटलं, तेच त्यांनी केलं. त्यासाठी ते कोणत्याही टीकेला सामोरे जात असत. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींना पाठिंबा देणाऱ्या बाळासाहेबांनी, हिंदूराष्ट्र स्थापन करण्यासाठी भाजप बरोबर युती केली. बाळासाहेब हे राजकारणापलीकडले होते. अनेक जातीधर्मांच्या विविध क्षेत्रातल्या लोकांशी त्यांनी दिलखुलास मैत्री केली. राजकारण आणि मैत्री यात त्यांनी कधीही गल्लत केली नाही आणि म्हणूनच त्यांचे कित्तेक राजकीय विरोधक हे मित्र बनले.
राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये जास्त रस असल्यामुळेच, बाळासाहेबांना अतुलनीय लोकप्रियता लाभली. अशा ह्या व्यक्तीबद्दल मी काय बोलणार. पण इतकच सांगतो की असा बहुआयामी आणि प्रचंड लोकप्रिय नेता परत पाहायला मिळणे कठीण. आज ते आपल्यात नाहीत. जन्माला आलेल्या प्रत्येकाचा शेवट हा कधी न कधी होणारच. त्यांना माझा अखेरचा जय महाराष्ट्र !!
ऐसा नेता कधी न झाला ,
अन् पुन्हा कधी न होणार…
बाळासाहेब ठाकरे नाव अमर राहणार…
त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन…
जय हिंद…!!
जय महाराष्ट्र… !!!
गरीब-श्रीमंत
गरीबाला आपल्या भोकं पडलेल्या
जुन्या कपडयांची लाज वाटत असते ,
श्रीमंतांना आपल्या नवीन कपड्यांना
भोक पाडून ते परिधान करण्यात मजा वाटत असते...
एकीकडे गरीबाला कपड्याने आपले
अंग पूर्णपणे झाकायचे असते ,
श्रीमंताला मात्र त्यात समाजात
कमीत कमी कपड्यात वावरायचे असते...
गरीबाला फक्त आपल्या शरीरातील
पोटाची खळगी भरण्याची काळजी असते ,
श्रीमंताला आपले शरीर सतत तरूण- तजेलदार
कसे दिसेल याचीच काळजी वाटत असते...
एकीकडे गरीबाची चामडी
उन्हा-तान्हात काम करून काळी पडत असते ,
श्रीमंताने तेच उन न खाल्ल्यामुळे
त्याची चामडी पांढरी पडत असते...
गरीबाने शरीराचे चोचले
न पुरविल्यामुळेच त्याचे जीवन संपत असते ,
श्रीमंताने शरीराचे चोचले
अधिक पुरविल्यामुळे त्याचे जीवन संपत असते...
जीवन
जीवन हे मोजकच असतं ,
ते रडत कधी जगायच नसतं .
सुख दुःखाने आयुष्य घडत असतं ,
आपल्या दुःखाने कधी रडायच नसतं .
संकटांना तोंड दयायच असतं ,
पाठ फिरवून कधी घाबरायच नसतं .
कधी काही हरवतं तर कधी काही सापडतं ,
पण हरवल्याच दुःख कधी बाळगायच नसतं .
दुसरयासाठी आपणही थोड सुख विसरायच असतं ,
कारण आपल्याला हवं ते सगळं आपल्याला मिळत नसतं .
जीवन हे एकदाच जगायचं असतं ,
मरणानंतरही आपलं नाव इतरांना विसरु दयायच नसतं .
आपल जीवन आपणच घडवायच असतं ,
फुलासंगे फुलायचं की मातीसंगे मिसळायचं ते आपणच ठरवायच असतं .
- Sushant_R._Kanase
सांगा कसं जगायचं …??
सांगा कसं जगायचं ?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा..!
डोळे भरून तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना ?
ऊन ऊन दोन घास
तुमच्यासाठी वाढतंच ना ?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीच ठरवा..!
काळ्याकुट्ट काळोखात
जेंव्हा काही दिसत नसतं
तुमच्यासाठी कोणीतरी
दिवा घेऊन ऊभं असतं
काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीच ठरवा..!
पायात काटे रुतून बसतात
हे अगदी खरं असतं,
आणि फुलं फुलून येतात
हे काय खरं नसतं ?
काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं
तुम्हीच ठरवा..!
पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीच ठरवा..!
सांगा कसं जगायचं ?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा..!
*** ***
शब्द: मंगेश पाडगांवकर
आयुष्य…!!
आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं....!
रिकामं तर रिकामं,
लिहिलं तर छान असतं...!
शेवटचं पान मृत्यू अन्
पहिलं पान जन्म असतं...!
मधली पाने आपणच भरायची,
कारण ते आपलंच कर्म असतं...!
होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं,
कुठलंच पान कधी गाळायच नसतं....!
चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं,
कारण त्यातूनच
आपल्याला पुढे शिकायचं असतं.....!
नाती जपण्यात मजा आहे
बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे
जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
येताना एकटे असलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे
नशीब कोणी दुसरं लिहित नसतं
आपल नशीब आपल्याच हाती असतं
येताना काही आणायच नसतं
जाताना काही न्यायचं नसतं
मग हे आयुष्य तरी
कोणासाठी जगायचं असतं
याच प्रश्नाचे उत्तरशोधण्यासाठी
जन्माला यायचं असतं
- मंगेश पाडगावकर.
चारोळ्या
रात्रीचा अंधार घालवता येत नाही,
आणि त्या रात्रीला देखील
काजव्यांचा प्रकाश लपविता येत नाही.
सुखी आयुष्य…
तुमच जगातल स्थान असच सापेक्ष असत !
ते अविचल कधीच नसत …!
साबण बनवायला तेल जरूरी आहे आणि तेल काढायला साबणच लागतो !
हा अटळ विरोधाभास आहे…!
जगात दोनच प्रकारची माणसे आनंदात असतात !
जगा आनंदाने…
"एक छिद्र उरलेलं"
महाभारतातील ही गोष्ट
एक गरीब म्हातारा हस्तिनापूरला गेला.
काहीतरी दान मिळेल या आशेनं तो धर्मराजाला भेटला.
परंतु, तोपर्यंत सूर्यास्त झाला होता.
त्यानं धर्मराजाला काहीतरी दान द्यावं अशी विनंती केली.
तेव्हा धर्मराज त्याला म्हणाले,
'आता सूर्यास्त झाला आहे. त्यामुळे मी आता दान देवू शकत नाही. तू उद्या सूर्योदयानंतर केव्हाही ये. मी तुला निराश करणार नाही.'
तो गरीब म्हातारा नाराज होवून परत फिरला.
या दोघांमधला संवाद बाजूला बसलेले भीमसेन ऐकत होते.
तो गरीब म्हातारा निघून गेल्यानंतर भीमसेन धर्मराजाला म्हणाले,
'दादा, तुम्ही त्या याचकाला उद्या सकाळी दान देण्याचं वचन दिलं आहे. पण, एक विचारू? माणसाला दुसऱ्या दिवशीच्या आयुष्याची खात्री देता येते?'
धर्मराजाला स्वतःची चूक कळली.
त्यांनी लगेच त्या गरीब म्हाताऱ्याला बोलावलं आणि भरपूर दान दिलं.
गोष्ट इथं संपली....
पण, भीमानं विचारलेला हा प्रश्न छोटासा असला तरी, अस्वस्थ करणारा आहे.
आणि हा प्रश्न जो स्वतःला विचारतो, त्याला आयुष्याचं खरं महत्त्व कळतं.
'तो काल मला भेटला होता, आज तो नाहीये',
'तो मघाशी माझ्याशी फोनवर बोलला होता, आत्ता तो नाहीये.'
असे अनेक प्रसंग आपल्या आजूबाजूला नेहमी घडत असतात.
हा क्षण माझा आहे.
पुढचा क्षण माझा नाही, हे एकदा का आपण आपल्या मनात रूजवले की, संताप, चीड, द्वेष, मत्सर या सगळ्या भावना आपोआप गळून पडतात आणि हातात राहते ते सूर ताल, लय, ठेका घेवून आलेलं आयुष्याचं रंगीबेरंगी गाणं!
जी मोठी माणसं किंवा नेते मंडळी असतात, ते गेल्यानंतरही त्यांचे चौकात पुतळे होतात.
जे शास्त्रज्ञ, विचारवंत असतात, त्यांचे विचार आपल्याला ते गेल्यानंतरही पुस्तकातून भेटतात.
जे कलावंत, गायक, खेळाडू असतात, ते गेल्यानंतरही ते त्यांच्या कलेतून, कृतीतून आपल्याला आठवतात.
पण आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय?
शरीरातून जीव गेल्यानंतर कुठे असतो आपण?
कुठल्या रूपात मागे उरतो आपण?
माझ्या घरात आज मी आहे.
उद्या मी नसेन.
माझ्या जागी एक मिणमिणता दिवा असेल.
दहा दिवसांनी तो दिवा विझेल.
मग, त्या जागी माझा एक फोटो असेल.
लाकडी चौकट, कोरीव नक्षीकाम, हसरा फोटो.
काही दिवसांनी माझ्या लटकलेल्या फोटोवर साचलेली धूळ असेल किंवा त्या फोटोची पातळ काच वेडीवाकडी तडकलेली असेल.
काही वर्षांनी माझा तो हसरा फोटो भिंतीवरच्या छिद्रातून खिळ्यासकट निखळलेला असेल...
आणि मग त्यानंतर पिढ्यान् पिढ्या, माझ्याच घरात, माझ्या नावाचं फक्त उरलेलं एक छिद्र असेल !
आपलं रूपांतर अशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानात मिळालेल्या ह्या श्वासांच रूपांतर आपण 'उत्सवात' करायचं का?...
इतिहास सांगतो काल सुखी होतो.
भविष्य सांगतं उद्या सुखी असशील.
पण...
तुमचे मन आणि विचार चांगले असेल, तर रोजच सुख आहे... नाही का ?
तर, मग,
जगा आनंदाने !!!
स्वप्न माझं…
स्वप्न माझं आहे,
तुझ्यासोबत जगण्याचं,
हातात हात घेऊन,
एकाच दिशेन चालण्याचं…
स्वप्न माझं आहे,
तुला जवळून पाहण्याचं,
जवळ तुला घेऊन,
एकदा मिठीत घेण्याचं…
स्वप्न माझं आहे,
तुझ्या सोबत राहण्याचं,
छोठसं घरट बांधून,
त्यात दोघांनीच राहण्याचं…
स्वप्न माझ आहे,
मी चित्र रेखाटण्याचं,
त्यात रंग भरून,
ते तू रंगवण्याचं ...
स्वप्न माझं आहे ,
तू स्वप्न बघण्याचं,
आणि दोघांनी मिळून,
ते पूर्ण करण्याचं…
❤
भेटत....
ती पण नाही,
भेटत...
मी पण नाही....
निभवणे तिला जमत नाही,
आशेवर ठेवण मला
पटत नाही.
फसवत
ती पण नाही,
फसवत
मी पण नाही....
तिला रुसण्याचे दु:ख
आहे,
मला एकटेपणाची
भीती आहे....
समजत...
ती पण नाही,
रागवत.....
मी पण नाही......
कुठल्यातरी वाटेवर
भेट होत असते नेहमी
बघत...
ती पण नाही,
थांबत...
मी पण नाही....
जेव्हा पण बघतो तिला,
ठरवतो काहीतरी
बोलेन तिच्याशी....
ऐकत..
ती पण नाही,
सांगत..
मी पण नाही....
पण एक गोष्ट मात्र
खरी आहे,
प्रेम माझे आजही
आहे तिच्यावर
नाकारत ..
ती पण नाही,
सांगत...
मी पण नाही.......
माय…
कळतच नव्हत मला,
माय माझी एकटीच का रडायची |
तिच्या ताटातली अर्धी भाकर, रोजच मला का वाढायची ||
माझ्या आधीच हात धुवून,
रोजच दूर अंधारात बघायची |
काय पहात होती कुणास ठाऊक पण,
पदराखाली मला घट्ट धरून बसायची ||
पाऊस नव्हता तरी सुद्धा, माझ्या अंगावर थेंब पडायची |
मांडीवर मला थोपटतांना,
तिची का झोप उडायची ||
काहीच नव्हते घरात तरी,
ती घराला फार जपायची |
एकच होत लुगड तिला,
तेच ती धुवून रोज नेसायची ||
सणावाराच्या दिवशी मात्र,
माझ्यावर करडी नजर ठेवायची|
जावू नये कुणाच्या घरी म्हणून,
मला घरातच लाडीगोडी लावायची ||
रोजच सकाळी हात जोडून, देवाला काहीतरी मागायची |
गालावर हात फिरवून माझ्या,
बोटे तिच्याच डोक्यावरती मोडायची ||
मातीच्याच होत्या भिंती,
पांढर्या मातीनेच लिंपायाची |
अंगणात टाकायची सडा नि,
घर शेणाने सुंदर सारवायाची ||
सकाळीही रोजच मला,
घासून अंघोळ घालायची |
चुलीवरल्या भाकरीचा घास,
तिच्या हातानेच भरवायची ||
शाळेत मला धाडतांना, स्वप्ने मोठमोठी बघायची |
सांजच्याला थकायचा चेहरा तिचा,
तरी माझ्याकडे पाहून हसायची||
कळतच नव्हत मला,
आई एकटीच का रडायची |
तिच्या ताटातली अर्धी भाकर, रोजच मला का वाढायची।।
असच काहीतरी……
आमचा देव दगडाचा नाही.
आम्ही दगडात देव पाहणारी
माणसं आहोत.
दगडात देव असतोच, मुर्ती
असतेच.दगडाचा फ़क्त नको असलेला भाग काढुन टाकायचा
असतो.मुर्तीच्या भागाकडे फ़क्त लक्ष ठेवा. फ़ेकुन द्यायच्या
भागाकडे नको. आणी मग ह्याच भावनेनं, निसर्गातल्या इतर
गोष्टींकडे पहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणी
शेवटी माणुस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला
शिका. ह्याची सुरुवात स्व:तपासुन करा. स्व:तला
नको असलेला भाग कोणता? तर ज्यापायी आपला आनंद,
प्रगती, निष्टा आणी आत्मविश्वास ह्याला तडा जातो तो
आचार, तो विचार हा टाकायचा भाग.
स्त्री’ ला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं,
'तुला बुद्धी हवी का सौंदर्य?’ तेंव्हा ती स्त्री म्हणाली,
'बुद्धीची गरज नाही, सौंदर्यच दे! 'का?' 'बुद्धीच्या
सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही, पण सौंदर्याच्या
जोरावर बुद्धी विकत घेता येते.’
"आपत्ती पण अशी यावी कि तिचा इतरांना हेवा
वाटावा....व्यक्तिचा कस लागावा.पडायचंच असेल तर, ठेच
लागुन पडू नये, चांगलं २००० फ़ुटांवरुन पडावं..म्हणजे माणूस
किती उंचावर पोचला होता हे तरी जगाला समजेल. !"
पशू माणसांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत कारण ते INSTINCT वर
जगतात...बेदम वजन वाढलंय म्हणून घारीला उडता येत नाही,
किंवा एखादा मासा बुडाला असं कधी ऐकलंय का ?
एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय
काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्याचा. मग लक्षात
येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही,
जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही.
चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही,
कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते.
कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता
आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी
पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या
त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ
सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या
ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच
वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते.
आपण जमिनीवरच आहोत
जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुद्धा आपोआप
विझते.
खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास
होतो.
प्रॉब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक
प्रॉब्लेमला उत्तर हे असतचं. ते सोडवायला कधी वेळ हवा
असतो, कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही
गोष्टीपलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो.
एकाकीपण वेगळं , एकांत वेगळा . परीसराचं मौन म्हणजे एकांत
.आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण
.एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं.
अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्यावर
हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका
होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार
केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला
असेल.
आकाशात जेव्हा ऊपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या
बाहेर पिटाळुन लावे पर्यंत संघर्ष असतो, त्याने गती घेतली की
उरलेला प्रवास आपोआपच होतो . असच माणसाचं
आहे.......समाजात एक विशिष्ट ऊंची गाठे प्रर्यंत सगळा संघर्ष
असतो. पण एकदा अपेक्षित ऊंचीवर पोहोचलात की
आयुष्यातल्या अनेक समस्या ती ऊंचीच सोड्वते.
सर्वात जिवघेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट
करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसताना
पदरी फक्त वाईटपणा यावा, सद-हेतूंचीच शंका घेतली जावी,
हा!
पावसातून भटकताना अंगावरचा शर्ट भिजतो , तेंव्हा काही
वाटत नाही. तो अंगावरच हळू हळू सुकतो त्याचंही काही
वाटत नाही.सुकला नाही तरी ओल्याची सवय होते.पण म्हणून
कोणी ओलाच शर्ट घाल म्हटले तर.....
प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही,कधी ना कधी ते
पळणार्याला गाठतातच,पळवाटा मुक्कामाला पोहचवत
नाहीत, मुक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच...
निर्णय चुकीचा आहे की बरोबर हे काळावर मोजायचं की
बुध्दीवर ?बुध्दीच नसेल तर ३ तास दिले तरी पेपर कसा
सोडवणार ?
-व.पु.काळे…
जीवनाच्या वाटेवर…
जीवनाच्या वाटेवर चालावे लागते एकट्याला,
संगती असतात थोड्या काळासाठीच सोबतीला....
जीवनाच्या वाटेवर चालावे लागते काट्या मधुन,
फ़ुले सुध्दा असतात कधी कधी अधुन मधुन…
जीवनाच्या वाटेवर मिळवण्यासाठी यश, पचवावे लागते पहिल्यांदा अपयश.
यश मिळत नक्कीच प्रयत्नातुन,
पण प्रयत्न करावे लागतात मनातुन…
जीवनाच्या वाटेवर चालने नाही सोपे,
वाटेवरुन जाताना बसतात जबर धक्के,
त्यासाठी लागतात साथीदार पक्के.
जीवनाच्या वाटेवर असतात खाच खळगे,
या वाटेवरुन जाताना आयुष्य जाते सगळे.
तरीही या वाटेवर सगळे चालतच राहतात,
सुखाच्या एक झुळकेने दुःख सगळे विसरुन जातात…
क्षण…
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा..
पाण्याच्या खळखळत्या प्रवाहाप्रमाणे असतो....
एकदा स्पर्श केलेल्या पाण्यास जसं आपण
पुन्हा स्पर्श करू शकत नाही,
तसंच जीवनात येणारा प्रत्येक क्षण हा वाहता प्रवाहच आहे....
या क्षणाचं सोनं करायचं असेल तर प्रत्येक क्षणाला समरसून जगायला हवं....
आनंदाच्या लाटांवर
आरूढ होऊन....
आपलं ध्येय गाठायला हवं....
आपल कुणीतरी…
का कुणास ठाऊक प्रत्येकाला वाटते
कुणीतरी आपल्यासाठी असावे…
ज्याच्यावर आपण थोडेफार रुसावे
आपल्या डोळ्यातील अश्रु एकदा तरी त्यानेच पुसावे…
रागवता आपण, त्याने आपल्याला समजवावे
मनातील व्यथांना त्याच्याच जवळ मोकळे करावे…
उशिर झाला केव्हा तर लटके लटके रुसावे
पण वाट पहात आपली त्याने तिथेच असावे
केव्हा नटता सावरता आपण,
त्याने मनापासुन कौतुक करावे…
का कुणास ठाऊक मला पण वाटते..
कुणीतरी फक्त आपल्यासाठी असावे...…
…सुशांत
नाती…
जीवनात नाती तशी
अनेकच असतात,
पण ती जपणारी लोक
फार कमीच असतात......|
काही नाती असतात रक्ताची,
तर काही हृदयाची......|
काही नाती असतात जन्मो-जन्मीची,
तर काही क्षणापुरतीची......|
काही नाती असतात,
केसांसारखी न तुटणारी,
पण वेळ आलीच तर वाकणारी.....|
काही नाती असतात,
लांबुनच आपले म्हनणारी,
जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी.....|
काही नाती असतात,
पैशाने विकत घेता येणारी,
तर काही प्रेमाने आपलेसे करणारी......|
काही नाती असतात,
न जोडता सुद्धा टिकणारी,
तर काही जोडून सुद्धा तुटणारी.........
शब्द्…
शब्दांनी शिकवलय पडता पडता सावरायला,
शब्दांनी शिकवलय रडता रडता हसायला,
शब्दांमुऴे होतो एखाद्याचा घात आणि
शब्दांमुऴे मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ,
शब्दांमुऴे जुऴतात मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुऴे चढतो एखाद्याचा पारा,
शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी ,
आणि शब्दांमुऴेच तरऴते कधितरी डोऴ्यात पाणी...
"म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल"