भाऊंच्या घरची लगीन घाई सरली होती. घरात पोराच्या लग्नाचा पहिलाच बार असल्यानं झाडून सारी पावणं रावळं नि भावकी जमली होती. सात-आठ पोरांच्यातलं पहिलंच लगीन असल्यानं वरमाय वरबापासह साऱ्यांचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता. लग्नाच्या लगीन घाईत पायाला पाय नसताना डोक्यात अनेक विचारांची गर्दी असताना वरबाप असणाऱ्या भाऊंच्या डोक्यात मात्र दुसऱ्याच काळजीने घर केलं होतं. लग्नाइतकंच तिकडंसुद्धा मन घिरक्या घेत होतं. त्याच काय झालं असेल ? त्यो असंल का ? एवढं थांबल्यासारखं आजचा दिस तरी त्यानं थांबावं. देवाने त्याचं गाऱ्हाण ऐकलं होतं. लगीन पार पडलं. तो मात्र भाऊंची नि घरच्यांची वाट डोळ्यात प्राणआणून पाहत थांबला होता.
(काल्पनिक चित्र) |
भाऊ लगबगीनं पह्यलं त्याच्याकडं गेलं. पाह्यलं, पापण्यांची उघडझाप चालू होती. अस्थिपंजर देह पडला होता. नकळत भाऊंच्या तोंडून शब्द बाहेर पडलं, 'कशातरं जीव अडकलाय ?' दोघ एकमेकाकड पाहत होती त्या डोळ्यात इमान होतं. आपुलकी होती, माया होती, प्रेम होतं नि कृतज्ञता होती.
सतरा वर्ष दावणीला इमान राखून राहिलेला बिस्त्या म्हातारपणानं थकून पडला होता. दहा दिवसात तर पायाची नि डोळ्याचीच काय ती हालचाल होत होती. जीव कसा जात नव्हता याच साऱ्यांना नवल वाटत होतं. परड्यात खळभर रानात आडवा पडलेला, नुसता हाडांचा सांगाडा राहिलेल्या बिस्त्याकडे पाहत भाऊंच्या डोळ्यापुढे बिस्त्याचा गतकाळ उभा राहिला..
बळीच्या पंखागत पांढराशुभ्र, धिप्पाडच्या धिप्पाड उंच नि लांब, पड्याल गडी उभा राहिला तर अड्यालनं काय दिसल ? वावभर फताड्या शिंगाचा, काळभोर केसांची गोंड्यांची शेपटी भुई लोटायची, बैल चालला की घागरीएवढं वशिंड डुलायचं नि त्याची ऐट वाढायची. रुपानं जसा कामालाभी तसाच. आठ बैलांचा न्हाईतर दहा बैलांचा नांगर असुदे कुठल्यांभी वाड्यांला घाला पाऊण्ड न्हाई टाकून देणार दुसऱ्याला पुढं. पाभरीला जुपला तर फण काय सोडलं भूमितीच्या मास्तरांची रेषा वाकडी हुईल पण बिस्त्याचा पाऊंण्ड काय वाकडा पडंल. आंधळ्यान हाणावा, कुठंही नि कुणाबरही जुपावा मान न्हाई कधी खाली गेली.
वरसा दीडवरसाचं असताना हे खोंड दावणीला आणलं नि भाऊंच्या घरात, शेतात, दावणीला बरकत व्हायला लागली. बैलाचा पायगुण चांगला हाय. त्याच्या पायात लक्ष्मी हाय अस सारी म्हणाया लागली. भाऊंनी त्याची वज चांगली राखल्यामुळं बिस्त्या मुसमुसत होता. कामात फुसफुसत होता. खुरानं माती उडवत डिरकत होता पण घरातल्या कोणाला कधी शिंग न्हाई हालवलं. भाऊंच्या गैरहजरीत घरातल्या बायकांमाणसांनी, पोराठोरांनी बिनधाक दोन दाव्यानं सोडावा, पण दुसऱ्याला मात्र पुढं काय येऊन दिल ! घराच्या मागल्या दाराला लागूनच परडं, दार वाजलं की बिस्त्या हंबरायचा, रातच्याला कितीही उशीरां घराच्या फर्लांगभर अंतरावर भाऊ आलं की बिस्त्या हंबरायचा. त्याचं हंबरण म्हणजे भाऊंच्या येण्याची वर्दी असायची.
बेंदराच्या सणाला तर पायाच्या खुरापासून ते शिंगाचा टोकापर्यंत कुठंही कसाही रंग लावा, बिस्त्या मात्र शांत, पाठीवर झूल, डोक्यावर बाशिंग, शिंगात शेंब्या, रुमाल, फुगे, गळ्यात घुंगुरमाळा घातलेल्या बिस्त्याचा थाट काही औरच असायचा.
एका सकाळी दोन-अडीच वर्षाच्या लेकराला बाजूला बसवून घरधनीन परड्यात म्हशीची धार काढत होती. धार काढण्यात ती गुंतली होती. थोड्या वेळानं बाळाच्या रडण्याचा आवाज आला तसं तीनं धार काढता काढता वळून पाह्यलं तशी वाचाच बंद झाली. काळजाचा ठोकाच चुकला. दुधाचा तांब्या टाकून 'येSS देSवा' म्हणून ओरडली. पोरगं चालत चालत बिस्त्याच्या पायाजवळ जाऊन रडत होतं. बिस्त्यानं थोडा जरी पाय हलवला असता तर संपलं असतं सारं, पण बिस्त्या मात्र तीळमात्र जागचा हालला नव्हता. बायनं धिटाईनं पोरगं उचललं, तिचं काळीज लव्हाराच्या भात्यासारखं हालत होतं. पोरगं रडत होतं, बिस्त्या मात्र काही घडलंच न्हायच्या थाटात उभा होता.
माणसाप्रमाण इतर दावणीच्या जणावरांशी तो प्रेमानं वागायचा. कुत्रं, करडं, रेडकू यायची त्याच्याशी खेळायची. दावणीत पुढं बस, शेपटी ओढ, अंगावर उड्या मार, बिस्त्या मात्र आजोबासारखा त्यांच्याशी वागायचा. घराला घरपण कर्त्या माणसानं ठेवायचं असतं तसं गोठ्याचा गोठेपणा बिस्त्यानं ठेवला होता. दावण कशी भरली भरलीशी होती.
बिस्त्या वयान थकला पण इमान न्हाई कधी सोडलं. म्हणून भाऊंनी ठरवलं याला दावणीला मरु द्यायचं. त्याचं आता वय झालं होतं. मरणाच्या दारात तो आडवा पडला होता. दिसाआड त्याच अंग पलटाय लागायचं एका जागेवर पडून अंगावर जखमा झाल्या होत्या. तशातच घरात लगीन ठरल्यालं, लग्नाच्या आगोदर बिस्त्या जीवं सोडील असं सगळ्यांना वाटलं, पण... लगीन झालं, दुसऱ्या दिवशी वरात झाली. बँण्डवालं सुद्धा एक दिवस थांबवलं, बिस्त्या गेला तर त्याची शेवटची वरात वाजत काढायची म्हणून. पण बिस्त्या मात्र किलकिल्या डोळ्यानं मालकाच्या घराकडं पाहत होता. जीव धरून होता. धा-पाच मिनटाला भाऊ परड्यात येऊन त्याला पाहत होते. त्याच्या डोळ्याकडं पाहिल्यानंतर भाऊंना वाटायचं याला काय तरी सांगायचाय. याचा जीव कशात तरी अडकलाय, पण जीव अडकायला ते का माणूस हाय थोडंच. खाली वाकून बिस्त्याच्या मस्तकावरनं हात फिरवला. बिस्त्याच्या डोळ्यातनं टपकन दोन टीपं गळली जणू त्याला सांगायच होतं, 'मालक माझ्या पायातली लक्ष्मी मी माझ्याबरोबर न्हाय न्हेत. घरात माप ओलांडून भरल्या पायानं लक्ष्मी आली आता माझी जबाबदारी संपली, माझी वेळ झाली.'
(काल्पनिक चित्र ) |
- राजेंद्र कणसे (९०११८६७३३९)
( सदर कथा वास्तवाशी निगडीत असून, हा लेख दैनिक पुढारी (रविवार पुरवणी) , दिवाळी अंक धनसंतोष व साप्ताहिक किशोर यामध्ये प्रकाशित झालेला आहे.)
No comments:
Post a Comment