हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन त्यांच्यबद्दल थोडसं…
शिवसेना... झिंदाबाद !
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा... विजय असो !!
आवाज कुणाचा...शिवसेनेचा !!!
अशा गर्जनांनी अवघा महाराष्ट्र दणाणत होता. साठच्या दशकात बाळ केशव ठाकरे नावाचं चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आदळले. त्याच्या तडाख्याने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. एवढ्याने न थांबून पुढे हे वादळ दिल्लीवर जाऊन धडकले, भारताच्या विरोधी राष्ट्रांवरही त्याची कंपने जाणवू लागली.
समाज प्रबोधनाचा वारसा आपल्या वडिलांकडून लाभलेल्या बाळ ठाकरे यांनी १९६० साली मार्मिक ह्या साप्ताहिकामधून समाजातील व्यंगावर आपल्या कुंचल्याद्वारे ठाकरी आसूड ओढण्यास सुरुवात केली. एवढ्यानेच ते थांबले नाहीत, तर महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी १९६६ मध्ये शिवसेना ही संघटना स्थापन केली. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज्यांवर दृढ श्रद्धा असणाऱ्या ठाकरेंनी निवडलं मराठी साम्राज्याचं निशाण, "जरी पटका" आणि संघटनेचे प्रतिक ढाण्या वाघ. अतिशय तेजस्वी चर्या आणि प्रभावी वक्तृत्वाने त्यांनी लोकांच्या मनावर गरुड केलं. आणि मग बाळ ठाकरेंचे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कधी झाले हे समजलंदेखील नाही. दक्षिण आणि मध्य मुंबईतल्या समस्त तरुणवर्गाचे मन बाळासाहेबांनी कधीच जिंकले होते. सुरुवातीला कम्युनिस्टांची दादागिरी मोडून काढून त्यांनी ह्या विभागात भगवा फडकवला. दक्षिणात्य लोकांचे अधिपत्य असलेल्या नोकऱ्यांमध्ये मराठ्यांना प्राधान्य मिळून देण्यासाठी त्यावेळी त्यांनी "लुंगी हटाव, पुंगी बजाव" आंदोलन छेडले. शिवसेनेचा ढाण्या वाघ महाराष्ट्रभर डरकाळ्या फोडीत हिंडू लागला.
बाळासाहेब हे अतिशय परखड होते. त्यांना जे योग्य वाटलं, तेच त्यांनी केलं. त्यासाठी ते कोणत्याही टीकेला सामोरे जात असत. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींना पाठिंबा देणाऱ्या बाळासाहेबांनी, हिंदूराष्ट्र स्थापन करण्यासाठी भाजप बरोबर युती केली. बाळासाहेब हे राजकारणापलीकडले होते. अनेक जातीधर्मांच्या विविध क्षेत्रातल्या लोकांशी त्यांनी दिलखुलास मैत्री केली. राजकारण आणि मैत्री यात त्यांनी कधीही गल्लत केली नाही आणि म्हणूनच त्यांचे कित्तेक राजकीय विरोधक हे मित्र बनले.
राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये जास्त रस असल्यामुळेच, बाळासाहेबांना अतुलनीय लोकप्रियता लाभली. अशा ह्या व्यक्तीबद्दल मी काय बोलणार. पण इतकच सांगतो की असा बहुआयामी आणि प्रचंड लोकप्रिय नेता परत पाहायला मिळणे कठीण. आज ते आपल्यात नाहीत. जन्माला आलेल्या प्रत्येकाचा शेवट हा कधी न कधी होणारच. त्यांना माझा अखेरचा जय महाराष्ट्र !!
ऐसा नेता कधी न झाला ,
अन् पुन्हा कधी न होणार…
बाळासाहेब ठाकरे नाव अमर राहणार…
त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन…
जय हिंद…!!
जय महाराष्ट्र… !!!
No comments:
Post a Comment