चारोळ्या

चमकणाऱ्या काजव्यांना
रात्रीचा अंधार घालवता येत नाही,
आणि त्या रात्रीला देखील
काजव्यांचा प्रकाश लपविता येत नाही.

रातराणीचं आयुष्य म्हणतात
एका रात्रीचं असतं,
एका रात्रीचं असल तरी
मोठ्या खात्रीचं असतं.

इथे प्रत्येकाला वाटते
आपण किती शहाणे,
यावर उपाय एकच
सर्व शांतपणे पाहणे.

इथे प्रत्येकाला
प्रत्येकाचा भूतकाळ आहे,
मला जगानं खूप छळलं
हा प्रत्येकाचा आळ आहे.

जमिनीतले पाणी मिळते
मूळ तेव्हा रुजते
निष्पर्ण झाडावर प्रेम बसरते
तेव्हा त्यालाही पालवी फुटत.

माझं मला काळतं
कसं मी राहायचं,
तूच तुझं ठरव मला
कोणत्या दृष्टीने पाहयचं.

माझ्या मनाचा मला
आरसा करता आला असता,
तर तुलाही तुझा चेहरा
त्यात पाहता आला असता.

सारं विश्व बदलताना
मी डोळ्यांनी पहिलं,
पण या जगासोबत मला
बदलायचं राहिलं.

खरोखरच काटे
एवढे कठोर नसतात,
त्याशिवाय का फुलं
त्यावर फुलून हसतात.

आपापल्या परीने
प्रत्येक जण सोसत असतो,
मी खूप सोसलं असं
समोरच्याला भासवत असतो.

सुसाट सुटलेलं वादळ
कुठेतरी शांत होतं,
उन्मळून पडलेल्या झाडासोबत
शेवटी तेही निवांत होत.

No comments:

Post a Comment