प्रिय जात,
तू कुठे आहेस, कशी आहेस मला माहित नाही. पण काल परवा उसळलेल्या गर्दीत तू मला दिसू लागली होतीस. आता कुठे गायब झालीस माहीत नाही, भेटली नाहीस तुझ्याशी बोलायची हिंमत नाही; म्हणून वाटलं की तुला पत्रच लिहावे. त्याशिवाय आपलं बोलणं होणार नाही.
तर झालं असं,
'मी आपला साधा-भोळा सरळ मार्गी माणूस; आपलं काम भलं नि आपण भलं. दिवस रात्र कष्ट करत जगतोय. काल-परवा भिरभिरणाऱ्या त्या दगड-गोट्यांत, रस्त्यावर साचलेल्या काचेच्या तुकड्यांत, उसळणाऱ्या त्या आगीच्या धुरांत मला तू दिसत होती. एवढी का ग तू लोकांनी प्रिय झालीस ? जन्म देणे तुझ्या हाती नसतं मग जन्मल्यावर का तू त्या निष्पाप देहाच्या पाठी चिटकून फिरत असते ? शेवटी त्या देहाची काय चूक ? इथे कुणाला तू माहीत सुद्धा नसते; परंतु शाळेच्या दाखल्यापासून तुझी सुरुवात होते ती नोकरी संपेपर्यंत तू साथ सोडत नाहीस. यामुळेच लोकांना तू हवीशी वाटत आहेस आणि तुझ्यासाठी ते रस्त्यावर उतरून एकमेकांचे जीव घेत आहेत. तुला मात्र त्याच काहीच वाटत नाही. सारं काही चित्र पाहून मनात तू हसत तर नाहीस ना !तू कुठे आहेस, कशी आहेस मला माहित नाही. पण काल परवा उसळलेल्या गर्दीत तू मला दिसू लागली होतीस. आता कुठे गायब झालीस माहीत नाही, भेटली नाहीस तुझ्याशी बोलायची हिंमत नाही; म्हणून वाटलं की तुला पत्रच लिहावे. त्याशिवाय आपलं बोलणं होणार नाही.
तर झालं असं,
तुला काय वाटत असेल ते माहीत नाही. पण मला मात्र फार दुःख होते, मनात वेदना होतात; सारं काही असह्य होतंय. कितीतरी निष्पाप देहांना तुझ्यामुळे यातना सोसाव्या लागत आहेत. जीव गमवावे लागत आहेत. तोडफोड होतेय, जाळपोळ होतेय; खूप नुकसान होतंय. सारं काही काळ सरल्यावर भरून निघेलही, पण मनांचे काय ? ती भरकटलेली मने येतील का ग जुळून. त्यांची खदखद काही केल्या थांबणार नाही. त्या वेदना काही केल्या मनांतून जाणार नाही. हे तुला कधी समजणार ? की सारं काही दिसत असून सुद्धा तू फक्त पाहतच बसणार ? इथं माणसाला पोटाच्या खळगीसाठी दिवसभर मरावं लागतंय. काहीजण भुकेवाचून मरतायत, त्यांना खायला अन्न मिळत नाहीये. किड्या-मुंग्यांसारखं आयुष्य जगतायत. त्यांचे दुःख तुला कधी कळणार. तुझी मात्र कमाल आहे, त्या स्टेजवरच्या पुढाऱ्यांनी ठोकलेल्या भाषणांत तुझा जयजयकार होतोय, तुला हारं-तुरं घातली जातायत. तुझ्या नावाचा जप करत ही मंडळी कोवळ्या तरण्या बांड पोरांना आपापसांत पटेवतायत, तुझ्या विषयी मनांत किल्मिश तयार करतायत. सळसळणाऱ्या रक्ताची ऐन तारुण्यात आलेली ही पोरं; तुझ्यासाठी रस्त्यावर उतरतायत. भविष्याचा विचार न करता वर्तमान अंधारात घालवतायत. आयुष्य सरत जातंय, वेळ निघून गेल्यावर सगळं काही समजतंय. तू मात्र सारं काही पाहून मनात हसत आहेस; अगदी त्या पुढाऱ्यांसारखे !
बस झाले आता तुझे हे लपून छपून गंमत पाहणे. तुझ्या ह्या गंमतीने इथे मात्र आयुष्याची रांगोळी विस्कटतेय. कुणाचा आधार जातोय तर कुणाचा संसार उध्वस्त होतोय. सुखाने जगत असलेल्या जीवांची तुझ्यामुळे राख होतेय. लहान असताना मला तुझा खूप अभिमान वाटायचा ! पण आता तस काही राहिलं नाही. तू मला नकोशी झालीयेस. तुझ्यामुळे बिघडणारा हा माझ्या अवती-भोवतीचा परिसर मला पुन्हा बिघडलेला पाहायचा नाही. ऐन तारुण्यात निष्पाप गमावलेले जीव मला पुन्हा पहायचे नाहीत. तुझ्या असण्याने मनापासून प्रेम करणाऱ्या कितीतरी प्रेमवीरांना तुझं असणं बोचत आहे, त्यांना तू नकोशी झाली आहेस. तुला विसरून ते एकत्र येत आहेत, पण तुझ्याच नावाने आमचेच नातलग ओरडत आहेत. तू नसतीस तर सारं सुरळीत चाललं असते असे मला आता वाटायला लागले आहे.
तुझ्यामुळे खूप शतके दुःख भोगलंय, सोसलंय. स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव करून गावाबाहेर राहायला लागलंय, खूप वेळा शाळेतूनही हाकलून दिलंय. गावाच्या पानवट्यापासून लांब थांबावं लागलंय. कितीतरी वेदना यातना सोसाव्या लागल्यात. तरीही निमूटपणे आजपर्यंत सहन केल्या, तुला कधीच काही बोललो नाही. पण आता राहवत नाही, जगाने या सीमा कधीच ओलांडल्या आहेत. तू मात्र त्या सोडायला तयार नाहीस. तू अशीच राहिलीस तर आपला हा समाज कसा पुढे जाणार. खरंच तू आता खूप दूर निघून जा, ह्या पुढाऱ्यांचे भांडवल होवून इथे राहू नकोस. तुझ्यामुळे खूप ह्रास झाला, आता यापुढे आम्हाला आनंदाने जगुदे. तुझ्याशिवाय आयुष्य आम्हाला जगुदे.'
- तुझाशी नातं तोडलेला
"एक जीव"
"एक जीव"
सदर पत्र हे प्रतिलिपी डॉट कॉम वरील पत्रलेखन स्पर्धे साठी लिहलेले होते. खालील लिंकवर ते पाहता येईल.
Wah...
ReplyDelete