To be or not to be that is the question जगाव की मराव हा एकच सवाल आहे. ह्या दुनियेच्या ऊकिरड्यावर खरकट्या
पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचार आनंदान ?
का फेकुन द्याव देहाच लखतर मृत्यूच्या काळाशार डोहामध्ये?
आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने?
माझा तुझा ह्याचा अन त्याचाही.
मृत्युच्या महासर्पाने जीवनाला असा डंख मारावा…
की नंतर येणा-या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही..
पण मग..
पण मग त्या
निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडु लागलं तर….? तर…तर…
इथेच मेख आहे.नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा
धीर होत नाही म्हणुन आम्ही सहन करतो जुन
जागेपण..
सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने
अभिमानावर होणारे बलात्कार…
अस्तित्वाच्या गाभा-यात असणा-या सत्वाची विटंबना..
आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेन आमच्याच मारेक-
यांच्या दाराशी.
विधात्या.. तु इतका कठोर का झालास?
एका बाजुला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुस-या बाजुला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तु हीआम्हाला विसरतोस.
पण मग विस्कटलेल्या हाडांचे
हे सापळे घेऊन हे करुणाकरा…
आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायावर डोक आदळायच? कोणाच्या पायावर ?
कोणाच्या ? कोणाच्या???
कुणी घर देता का घर ?
एका तुफानाला कुणी घर देता का ?
एक तुफान भिंतीवाचून, छपरावाचून, माणसाच्या
मायेवाचून, देवाच्या दयेवाचून जंगलाजंगलात हिंडतय.
जिथून कुणी उठवणार नाही अशी एक जागा धुंडतय.
कुणी घर देता का घर ?
रागावयचे नाही…
रागावून काय फायदा आहे आणि रडणारसुद्धा नाही.
माझ्या डोळ्यात आसवं जमा व्हायला लागले ना मग खिळे मारून खाचा करून टाकीन,
पण या आगीसमोर रडणार नाही.



